मुख्य सामग्रीवर वगळा

ध्यानाचे प्रकार - विचार ध्यान

चीन मध्ये एकदा एक माणसाने एका भिक्षुकडे हट्ट धरला... महाराज मला एखादा मंत्र द्या ज्याला मी सिध्द करू शकेल आणि ज्या मंत्राच्या सिध्द केल्याने मला लाभ होईल.. भिक्षुने नकार दिला पण तो माणुस काही ऐकायला तयारच नव्हता, सकाळची संध्याकाळ झाली पण तो माणूस काही भिक्षुचा पिच्छा सोडत नाही असे बघुन त्याला एक मंत्र सांगितला आणि सागितले की या मंत्राचा पुढच्या पंधरा दिवसांच्या आत सलग सात दिवस ठराविक वेळा जप करावा लागेल तरच हा मंत्र सिद्ध होईल, जर पुढच्या पंधरा दिवसात तु हा मंत्र सिद्ध नाही केला तर हा मंत्र काही कामाचा राहणार नाही.
मंत्र घेऊन तो माणूस आनंदाने घरी चाललाच होता की तेव्हढ्यात त्या भिक्षुने त्याला मागुन आवाज दिला. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलि. भिक्षु म्हणाले. या मंत्राचा माकड खुप मोठा दुश्मन आहे जर मंत्र जपाच्या सात दिवसांत एकदा जरी तुझ्या मनात माकडाचा विचार आला तर तुला दुसर्‍या दिवशी पुन्हा सुरवात करावी लागेल, त्यामुळे काहीही झाल तरी एक लक्षात ठेव, तुझ्या मनात माकडाचा विचार नाही आला पाहिजे याची काळजी घे. भिक्षुने चेतावणी वजा सूचना दिली. हो, तसाही कोणाच मन माकडाचा विचार करतं पण तरीही तुम्ही म्हणताय तर मी माकडाचा विचार नाही करणार. तो माणूस म्हणाल आआणि निघून गेला.
नऊ दिवसाने तो माणूस पुन्हा त्या भिक्षुकडे आला यावेळी चेहर्‍यावर भलतीच निराशा होती. काय झाल? झाला का मंत्र सिद्ध? भिक्षुने विचारले. कसल काय महाराज मी रोज जपाला बसलो की कोठुन काय माहीत पण माझ्या मनात माकडाचाच विचार यायचाच, इतकेच काय तर कधी नव्हे ते मला स्वप्न सुध्दा माकणाचेच पडू लागले. मी खुप प्रयत्न केला, रोज मी ठरवायचो की आज माकडाचा आजिबात विचार करायचा नाही पण पुन्हा पुन्हा तेच. माणसाने सांगितले...


वरच्या गोष्टीत आपल्याला अस आढळून येते की तो माणूस overthinking मध्ये अडकलाय. पण का? ज्या माकडाचा साधारण पणे आपण विचार करत नाही त्या माकडाच्या विचाराने त्याच्या हातातील संधी घालवली. पण अस का झाल? आपल्यासोबत पण कित्येकदा अस झाले असेल ना की एखादि गोष्ट, घटना किंवा विचार आपण विसरायचा प्रयत्न करतो तर तो विचार आपल्याला आणखी त्रास द्यायला चालू करतो.

 कित्येकदा तर आपण दिवस दिवस एकच विचार सतत करत राहतो तेही आपली ईच्छा नसताना. बरोब्बर ना? मी जर असे म्हटले कि आपण स्वतःच आपल्याला नको असणाऱ्या विचारांना सतत आपल्या मनात चालू राहण्यासाठी उर्जा पुरवत असतो, तर? तो कसा काय? तर याच उत्तर आहे त्या विचारांचा विरोध करून. मला नेमक काय म्हणायचे आहे ते आपण उदाहरण घेऊन समजूया. आपण नको असलेल्या विचारांना विरोध करणे म्हणजे माठात ओतलेल्या विहिरीच्या पाण्यातली माती तळाला बसली का हे पाहण्यासाठी आपला हात घालुन माठाचा तळ चाचपडण्या सारख आहे. आपण जीतक्यावेळा माठाच्या तळाला हात घालु तितक्याच वेळा आपण आपल्या हाताने तळाशी साचलेली माती पुन्हा पाण्यात मिसळून पाण्याला गढूळ करेल. आता आपण माठातले पाणी स्वच्छ करण्यासाठी दोन्हीपैकी एक गोष्ट करू शकतो. 
१ कुठलाही हस्तक्षेप न करता माती तळाशी बसेपर्यंत वाट पहाणे. 
२ तुरटीचा वापर करून किंवा एखाद्या गाळणीचा वापर करून पाणी स्वच्छ करणे.

 आता तुम्ही कदाचित म्हणाल की याचा over thinking शी काय संबंध? तर ते समजण्यासाठी हेच उदाहरण संदर्भ म्हणून घेऊन.
अस समजू कि तो गढूळ पाण्याने भरलेला माठ आपल मन आहे, त्यातली माती म्हणजे आपल्याला नको असलेले विचार आहेत. आपण नको असलेल्या विचारांना विरोध करण म्हणजे त्या माठात हात घालून पाहण्या सारखे आहे जितका आपण आपल्या विचारांना विरोध करू तितकेच आपल्याला नको असलेले विचार आपल्या मनात वर उठतील तर मग यावर उपाय काय? तर जस पाण्यातला गाळ खाली बसवण्याचे दोन उपाय आहेत तेच उपाय आपल्या मनासाठी सुद्धा काम करतात. एक जसा जसा वेळ जाईल तसे तसे जर आपण त्या विचाराचा विरोध करण हळूहळू कमी केले की तो विचार क्षीण होऊन आपल्याला त्रास द्यायचे बंद करेल. पण हा उपाय खुपच वेळखाऊ आणि त्रास दायक आहे कारण आपल्याला नको असलेल्या विचारांना आपण स्वाभाविकपणे विरोध करतो जो त्या विचारांना बलवान करतो. दुसरा उपाय म्हणजे ध्यानरूपी गाळणी वापरून मनाच्या अति विचार करण्याची प्रवृत्ती कमी करणे. यालाच आपण अतिविचारा पासुन मुक्ती कशी मिळवायची? किंवा How to get rid of overthinking? असे म्हणू शकतो.



विचार ध्यान म्हणजे काय? 
येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचे कोणताही हस्तक्षेप नकरता साक्षीदार होऊन फक्त आणि फक्त निरीक्षण करणे म्हणजे विचार ध्यान.

विचार ध्यान कसे करायचे?
१) शांत ठिकाणी कंबर, पाठ आणि मान सरळ राहिल असे ङोळे बंद करून बसा
२) मनात जो काही विचार येईल त्या विचारांचे साक्षीदार होऊन निरीक्षण करा. निरीक्षण करताना तो विचार चांगला आहे की वाईट होता असे कोणत्याही प्रकारची लेबलींग करू नका फक्त विचार आला तर विचार आलाय एवढेच भान ठेवा... कधी कधी असे देखील होईल की अक्षरशः घाणेरडे विचार येतील त्यावेळी ते विचार का आले, कशासाठी आले कींवा ईतर कोणत्याही प्रकारचा विचार किंवा विरोध करू नका, किंवा चांगले विचार आले तर त्या विचारांमध्ये गुरफटून जाऊ नका त्या ऐवजी येणाऱ्या विचारांची भावनाहीन पणे फक्त नोंद घ्या आणि जागरुक रहा. 
३) आपण ध्यान कोणत्याही प्रकारचे करत असु प्रत्येकाला लक्ष विचलित होण्याचा सामना करावा लागतो पण चिडचिड करण्या ऐवजी फक्त आपले लक्ष विचलित झाले आहे हे लक्षात घेऊन पुन्हा ध्यान करण्यावर शांतपणे मन केंद्रित करा. 


मी माझ्या ध्यान प्रवासाबद्दल व्यक्त मन - भाग 2 ध्यान  या पोस्ट मध्ये सांगितले आहे ती पोस्ट देखील वाचायला विसरू नका. ध्यान या विषयावर आणखी काही पोस्ट या ब्लॉगवर आहेत त्यााही तुम्हाला नक्कीच आवडतील. 

तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली हे सांगा कींवा नका सांगू पण कीमान दोन महिने रोज अर्धाच तास किंवा किमान 15 20 मिनिटे ध्यान करण्यासाठी देऊन ध्यान करण्याच्या फायद्यांचा अनुभव नक्कीच घ्या... 


टिप्पण्या